सोलापूर : पंढरपूर येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट (स्वेरी) संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयात छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची १४५वी जयंती नुकतीच साजरी करण्यात आली. या वेळी राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
या नंतर आयोजित कार्यक्रमात शाहू महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकताना एमबीएचे विभागप्रमुख प्रा. करण पाटील म्हणाले, ‘शाहू महाराजांनी शेतकऱ्यांसाठी स्वस्त दराने गवत मिळण्यापासून ते गोठ्याच्या सोईपर्यंत सर्व कार्यांना गती दिली. बेरोजगारांना रोजगार मिळावा म्हणून विहिरीचे खोदकामे, तलाव, रस्ते, कालव्यांची कामे काढली. गरिबांच्या घरी दुष्काळात गरजेच्या साहित्याचे वाटप, अनाथ, अपंग, वृद्ध व निराधार लोकांसाठी अन्नछत्रेदेखील काढली. व्याकुळ झालेली लहान मुलेदेखील राजांच्या नजरेतून सुटली नाहीत. त्यांच्यासाठी पाळणाघराची व्यवस्था केली. नागरिकांचे जीवन सुरक्षित राहण्यासाठी राजांनी जीवाचे रान करून सर्व प्रकारच्या सोयीसुविधा केल्या.’
‘शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाच्या प्रसाराची त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी इसवी सन १९१९ साली सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली,’ असे प्रा. पाटील यांनी सांगितले.
या प्रसंगी संस्थेचे संस्थापक सचिव व इंजिनीअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वेरी’चे कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम. एम. पवार, डॉ. धनंजय चौधरी, डॉ. संताजी पवार, डॉ. रंगनाथ हरीदार, प्रा. अमोल चौंडे, प्रा. शेख, प्रा. पंकज गायकवाड, प्रा. सचिन भोसले, नागेश ताडे, योगेश कदम यांच्यासह इतर प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.